सातपाटील कुलवृत्तांत
सातपाटील कुलवृत्तांत माणूस हा मुळातच भटका प्राणी..! शेतीचा शोध लावून त्याने काहीशी स्थिरता शोधाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते त्याला अजूनही जमले नाही हे आजही मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांवरुन अगदीच स्पष्ट आहे. तब्बल ८०० पानांच्या "सातपाटील कुलवृत्तांत" मध्ये अशी अनेको संक्रमणे सामावून घेताना लेखक रंगनाथ पठारे यांनी वाचकांना ७०० वर्षांच्या कालभ्रमंती सोबत इंग्लंड, अफगाणिस्तान पासून सातारच्या करंजे गावापर्यंतची स्थलभ्रमंती अगदी सहजपणे घडवून आणली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा आवाका असूनही कोणताही धागा कुठेही सुटताना दिसत नाही. प्रत्येक घटना आणि पात्र गुलमोशीच्या फुलात फुल गुंफून तयार केलेल्या सुंदर हाराप्रमाणे हळूवार गुंतवलेले आहे. कादंबरीतील पहिले पात्र श्रीपती हे देवगिरी सत्तेच्या अखेरच्या काळातील तर शेवटचे पात्र देवनाथ एकविसाव्या शतकातील असूनही कुठेही सांस्कृतिक सरमिसळ झालेली दिसून येत नाही. याऊलट साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव या सर्व नायकांचे अनुक्रमे निजामशाही, पानिपत युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, इंग्र...