" घालीन लोटांगण " या प्रार्थनेची अज्ञात माहिती !
"घालीन लोटांगण" या प्रार्थनेची अज्ञात माहिती !
( एक श्लोक मराठी, बाकी संस्कृत ! )महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही पूजेनंतर आरत्या म्हणतो. आरत्यांच्या नंतर '' घालीन लोटांगण वंदीन चरण " ही प्रार्थना म्हणतो. आज वर्षानुवर्षे -- पिढ्यानपिढ्या हा क्रम अव्याहत सुरूच आहे. यातील पहिल्या चार ओळी या शुद्ध मराठीत असून पुढची सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत आहे. असे का ? हा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडायचा. कित्येकांना मी विचारले तरी उत्तर सापडले नाही. ही अशी प्रार्थना कुणी सुरु केली, कुणी रचली ? पहिल्या मराठी श्लोकाच्या शेवटी " म्हणे नामा " असल्यामुळे हा श्लोक संत नामदेव महाराजांचा, यात कांही वाद नाही. मग पुढचे सर्व संस्कृतमध्ये कसे ? आपल्या आधीची पिढी म्हणत होती ना, म्हणून आपण सर्वजण " बाबा वाक्यम प्रमाणम " असे म्हणून तेच पुढे सुरु ठेवतो. मी देखील वर्षानुवर्षे श्रद्धेने म्हणत राहिलो पण याबद्दलचे औत्सुक्य कायम होते. माझ्यासारखा हाच प्रश्न आणखी कांहींना पडला असणारच आणि कुठेतरी याचे उत्तर असणारच.
ज्योत्स्ना प्रकाशनचे श्री. विकास परांजपे हे माझे नातेवाईक आहेत. ते देखील याचे उत्तर शोधत होते. त्यांचे मित्र श्री. रवी अभ्यंकर यांनी याचे पूर्ण उत्तर दिले. ते वाचून आपल्याला सर्वांनाच आश्चर्य वाटेल की अरे हे ५ श्लोक चक्क वेगवेगळ्या ५ ठिकाणचे आहेत.
(१) पहिलं कडवं ' घालीन लोटांगण ' हे संत नामदेवांचं आहे.
(२) दुसरे कडवे ' त्वमेव माता च पिता त्वमेव ' हा गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी हे श्रीगुरुस्तोत्रं लिहिले असून , ज्यात बहुपरीचित असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोकही समाविष्ट आहे.
(३) तिसरे कडवे ' कायेन वाचा ' हे श्रीमद्भागवतपुराणातील आहे. अठरा पुराणांपैकी हे एक असून ते महर्षी व्यासांनी लिहिलेले आहे. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथे कडवे 'अच्युतम केशवं ' हे ''अच्युताष्टकम् '' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलेले आहे. या काव्याचे नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवे आणि शेवटचे कडवे ' हरे राम हरे राम ' हे तर ' कलिसन्तरण ' ह्या उपनिषदातलं आहे.
हे सर्व संदर्भ वाचल्यावर माझ्या उत्सुकतेचे उत्तर सापडल्याचा आनंद झाला. एखादी प्रार्थना पूर्ण माहितीसह म्हटली तर ती मनाला अधिक समाधान देते. पण मग ही प्रार्थना अशा रीतीने कुणी बांधली असेल ? पूर्वी बहुतेक सर्व धार्मिक कार्यांचे मंत्र संस्कृत भाषेत होते. पण गावी देवाला घातले जाणारे गाऱ्हाणे, देवाचा मागितला जाणारा आशीर्वाद, गावागावातून, मठांमधून म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनांच्या स्थानिक आवृत्त्या या सर्व मराठीतून किंवा स्थानिक भाषेतून असतात. मला वाटते की सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजा, गणेशोत्सवासारखे उत्सव आणि सार्वजनिक आरत्या सुरु झाल्यावर याची गरज निर्माण झाली असावी. म्हणून मग सुरुवात मराठी आणि बाकी संस्कृत अशी प्रार्थना आकारत गेली असावी. याचे सध्याचे एक अत्यंत लक्ष्यवेधी उदाहरण म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला एका मंत्राचा जप सतत ऐकायला मिळतो. तो असा-- " ओम गं गणपतये नमोनमः, सिद्धिविनायक नमोनमः, अष्टविनायक नमोनमः, गणपतीबाप्पा मोरया " ! कुठून आला हा मंत्र ? आता यावर कांही भाष्य करण्यासारखेच नाही. तसंच काहीतरी या '' घालीन लोटांगण '' बद्दल घडले असावे. पण मूळ मुद्दा समजला याचा मात्र नक्कीच आनंद आहे.
पण आपण सर्वांनी हे " शात्रात रूढी बलीयसी " ( शास्त्रापेक्षा रूढी महत्वाची ) या न्यायाने ते अनेक पिढ्या जपले आहे.
✍️ मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

Comments
Post a Comment