श्रीरामभक्त भुईंजकर जाधवराव घराणें आणि रामदासी संप्रदाय...

 .                         🌙 श्री ☀️
                       श्री मार्तंड चरणी 
                       दृढभाव खंडोजी 
                       सुत रायाजी जाध
                              व राव 


श्रीरामभक्त भुईंजकर जाधवराव घराणें आणि रामदासी संप्रदाय. 


भुईंजच्या जाधवराव घराण्याच्या मस्तकीचा मुकुटमणी म्हणजे श्रीमंत रायाजीराजे जाधवराव. शिवछत्रपतींचे मातुल आजोबा श्रीमंत लखुजीराजे यांचे खापर पणतू खंडोजीराजे यांचे रायाजीराजे हे सर्वात थोरले नातू होय. रायाजीराजे छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचे अत्यंत विश्वासू व सातारा दरबारातील मान्यवर सरदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना एकूण १५ लाख रुपये उत्पन्नाचा सरंजाम शाहू महाराजांनी दिलेला होता. (भुईंजमध्ये असलेला प्रसिद्ध घुमट हा याच रायाजीराजेंची समाधी छत्री आहे.) 


श्री शाहू छत्रपतींच्या काळात मराठेशाहीस स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर रामदासी संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. समर्थ रामदासांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी मौजे मर्ढे या गावी कृष्णाकाठी रामदासी मठाची स्थापना केली. इथेच त्यांनी दासबोध ग्रंथ लिहून पूर्ण केल्याची माहिती मिळते. त्यांच्यापुढे हा मठ अनेक पिढ्या कार्यरत होता. सद्यस्थितीत हा मठ कार्यरत नसला तरी मर्ढे येथे पाहता येतो. 


श्रीशके १७२१ चैत्र वद्य एकादशीचे (१६ एप्रिल १७९९) श्रीमंत रायाजीरावांचे पावनबाबा रामदासी यांना दिलेले वतनपत्र उपलब्ध झाले त्यानुसार, 


मौजे मर्ढे, संमत लिंब, प्रांत वाई येथे पुर्वी श्री अमृतस्वामी यांनी श्रीरामचंद्राच्या मुर्तीची स्थापना करुन प्रतिवर्षी रामनवमीचा उत्सव, पुजा, नैवेद्य व संस्थानचा खर्च करत आले. त्याप्रमाणे आपणही (पावनबाबा) करत आहात. तेव्हा तुमचे चालवणे आम्हांस श्रेयस्कर हे जाणून, आमच्याकडे पुर्वपार सरकारातून जो भुईंज गाव इनाम आहे, त्या गावाजवळ मालदेवाची वाडी (मालदेववाडी) येथे १० बिघे जमीन नुतन इनाम करुन हे इनामपत्र आपणांस दिले आहे. तरी सदरहु जमीन तुम्ही व तुमचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेने अनुभवून पुर्ववत श्रींचा उत्सव करत जाणे. 


या पत्रावरुन श्रीमंत जाधवराव सरकारने मर्ढे येथील रामदासी मठास रामनवमी उत्सवाकरीता मालदेववाडी (भुईंज) येथील १० बिघे जमीन वतन दिल्याची माहिती मिळते. 

तसेच यातून रायाजीराजेंचा अष्टकोनी शिक्का व मोर्तब सूद सुद्धा पहिल्यांदाच प्रकाशात आली. सदर शिक्क्यात "मार्तंड चरणी दृढभाव" अशी उक्ती आहे. मार्तंड अर्थात श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड (श्रीक्षेत्र मुळठाण पाल-पेंबर) हे जाधवरावांचे कुळदैवत आहे. रायाजींच्या वडीलांचे नाव (खंडोजी) व शिक्क्यातील 'मार्तंड चरणी दृढभाव' या गोष्टींमुळे जाधवरावांची आपल्या कुळस्वामीवर असलेली श्रद्धा उद्धृत होते. 

संदर्भ: श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे खंड २ 


{सदर‌ पत्र पाहता, याचा कालखंड इ.स.१७९९ दिसतो. लेखात वरती नमूद केलेल्या श्रीमंत रायाजीराव राजे यांना २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या युद्धात वीरगती प्राप्त झाल्याची माहिती मिळते. तसेच रायाजीराजेंच्या वडीलांचे नाव लखुजी/लखमोजी (तिसरे) आहे. त्यामुळे सदर पत्रात नमूद रायाजीराजे हे रायाजीराजे द्वितीय असावेत असा अंदाज बांधता येतो. पराक्रमी पुरुषांची नावे पुढील पिढ्यांसही देण्याची पद्धत मराठा घराण्यांत पुर्वपार प्रचलीत आहे.} 


भुईंज मधील जाधवराव इनामदार वाड्यात कल्याणस्वामींनी स्थापन केलेले श्रीराम पंचायतन आहे. आजही इनामदार वाड्यात मोठ्या प्रमाणावर अगदी पारंपरिक पद्धतीने न‌ऊ दिवसांचा रामनवमी उत्सव व रामजन्म सोहळा साजरा केला जातो. 

(योगायोगाने याचवर्षी रामनवमी दिवशीच लहानपणीच्या रामनवमीच्या आठवणी, रोज रात्रीच्या नारदीय किर्तनाच्या आठवणी आणि उत्साही रामजन्म सोहळ्यावर लिहिणार होतो, दुर्दैवाने ते शक्य झाले नाही पण परवा 'सीतानवमी'ला आमचे सन्मित्र, इतिहास अभ्यासक Rohit Pawar यांनी सदर पत्र उपलब्ध करुन दिले आणि जाधवरावांच्या श्रीराम भक्तीवर लिहिण्याचा योग शेवटी आलाच..)


राम राम ! 

#रणमस्तबहाद्दर 


                                     ✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

Comments

Popular posts from this blog

हैबतबाबा पवार आरफळकर

शेखमिरा संस्थान

गावकुसावरील देवता